Sunday 13 April 2014

शरद पाटील यांच्या जीवन आणि कार्याची ओळख करून देणारे विविध लेख.



शपा (शरद पाटील)-प्रा.श्रावण देवरे  

राजकीय दरारा, जातीय (सरंजामी) दरारा, आर्थिक दरारा असे अनेक दारारा असलेले नेते गल्लो-गल्ली पायलीचे पंधरा सापडतात. परंतू वैचारिक-तात्त्विक दरारा असलेली व्यक्ती युगात एखादीच असते. दिड जिल्ह्यातील छटाकभर राजकीय पक्ष घेऊन देशाच्या राजकारणाला व तत्त्वकाराणाला जातीअंताचे क्रांतिकारक वळण देण्याची जबरदस्त इच्छाशक्ती बाळगणारा स्वातंत्र्योत्तर (सत्तरीनंतरच्या) काळातील एकमेव महापुरुष शपा होय! सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातील काही अंक नुसते चाळले तरी या वैचारिक-तात्त्विक दरार्‍याची कल्पना येते.
माणसं राजकीय व सामाजिक जिवनात जेवढी मोठी असतात तेवढीच ती व्यक्तिगत जिवनात लहान व संकुचितही असतात. याला कधी काळाच्या मर्यादा म्हटल्या जातात तर भारतीय संदर्भात या जातीय मर्यादाही असू शकतात. परंतू त्यांच्या ह्या मर्यादा कोणत्या काळात किती प्राधान्याने मांडाव्यात याचेही भान असले पाहिजे. बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाचे भांडवल करून त्यांचेपासून व चळवळीपासून लांब गेलीत. त्यांच्या वैचारिक दरार्‍याने आकर्षित झालेले कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाच्या दरार्‍याने जेव्हा पळून जाण्याची भाषा करीत तेव्हा ते म्हणत, या चळवळीत तुम्ही क्रांती करण्यासाठी आला आहात की माझे सौंदर्य बघण्यासाठी आला आहात? असाच एक आरोप- ‘तुम्ही फार बोजड लिहितात, समजायला फार कठीण, भलेभले विचारवंतही हतबल होतात.’ त्यावर ते म्हणतात- ‘इतिहास, भुगोल हे विषय सोपे असतात, सायन्स कठीण! फिजिक्स, केमेस्ट्रीची पुस्तकं इतिहास-भुगोलच्या परीभाषेत कशी लिहिणार?’ असे अनेक व्यक्तीगत व कौटुंबिक प्रसंग सांगायचे म्हणजे अनेक खंडी कादंबरी लिहू शकणारा नव्या युगाचा नेमाडेच जन्मावा लागेल. यातील काही प्रसंग शपांची उंची वाढविणारे आहेत तर बरेचसे प्रसंग शपांची खरी उंची दाखविणारे आहेत. परंतू आज या विशेषांकाचा विषय नाही.
एक कार्यकर्ता म्हणून मला भावलेल्या त्यांच्या काही क्रांतिकारक सिद्धांतांची मला येथे चर्चा करायची आहे. हे सिद्धांत त्यांनीच प्रथमतः मांडले आहेत असे नाही तर आधीच्या महापुरुषांनी मांडलेल्या काही क्रांतीकारक सिद्धांतांना 180 डिग्री मध्ये वळवून त्यांना पायावर उभे करण्याचे काम शपांनी केले आहे. याचे श्रेय ते त्यांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला देतात. ही अर्थातच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात केवळ नवी भर नाही तर नवे क्रांतीकारक वळण होय. जातीअंताच्या प्रश्नाला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या परीभाषेत उच्चतर स्थानावर नेऊन बसविणे, हे तसे सोपे काम नव्हते. आज काही विचारकांना ते सोपे वाटते. हे विचारवंत भारतीय जातिव्यवस्थेची पाळंमुळं शोधण्यासाठी आवश्यक असलेला प्राच्यविद्येचा कोणताही अभ्यास करण्याची तसदी न घेता, मार्क्सवादाचा ढोबळ वापर करून जातिअंताचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतात व फसतात. त्यामुळे आपल्याच लोकांनी उभे केलेल्या प्रश्नांना फेस करतांना त्यांच्या तोंडालाच फेस येतो.
मार्क्सने ज्याप्रमाणे हेगेल व फायरबाखच्या तत्त्वज्ञानाला विकसित करून एक नवेच क्रांतिकारक तत्त्वज्ञान निर्माण केले, त्याप्रमाणे कॉ. शरद् पाटील यांनी मार्क्स, फुले, आंबेडकर यांची खिचडी तयार केली आहे, असे कुचेष्टेने म्हटले जात होते. त्यांच्या ‘वर्गजातस्त्रिदास्यअंतक’ तत्त्वज्ञानाचे खरे नाव ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे होते. तथापि त्यांनी त्याचे व्यवहारिकरण (सोपेकरण नव्हे) करण्यासाठी ‘मार्क्सवाद फुलेआंबेडकरवाद’ असे तात्पुरते नामकरण केले होते. फुलेआंबेडकरांचे नाव घेतले म्हणजे जातिअंताची क्रांती करणारी दलित-ओबीसी फौज स्वनिर्मित नवे तत्तवज्ञान घेऊन क्रांती करेल असा त्यांचा अंदाज होता. माफुआचे धोरण घेऊन जातीअंताची सैन्य उभारण्यात त्यांना किती यश आले हे आपण पहातच आहोत. परंतू त्यात त्यांना यश प्राप्त झाले असते तरी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे नामांतर ठराविक काळानंतर ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे केलेच असते जे त्यांनी ठरवल्याप्रमाणे केलेलेच आहे.
माफुआ नामांतरित सौत्रांतिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान अजून प्रत्यक्ष संघटन व संघर्षाच्या पातळीवर प्रभावी ठरलेले नसले तरी त्याने निर्माण केलेल्या किंवा वापरात आणलेल्या शब्द-संकल्पना आज चळवळीवर प्रभाव गाजावित आहेत. माफुआ, वर्गजातस्त्रिदास्यअंत, ब्राह्मणी-अब्राह्मणी, संगिती आदि शब्द शपांची टिंगलटवाळी करण्यासाठी सर्रास वापरले जात होते, आता या संकल्पना चळवळीत गंभीरपणे वापरल्या जात आहेत. ही यशाची पहिली पायरी मानली पाहीजे. आज ‘परीवर्तनाचा वाटसरू’ सारख्या वैचारिक-तात्त्विक मान्यताप्राप्त मासिकाने शपांवर विशेषांक काढावा, हा केवळ शपांचा गौरव नव्हे तर त्यांनी मांडलेल्या सौत्रांतिक मार्क्सवादाचाही गौरव आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात जातिव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तिव्रतर होत असतांना त्याची दखल क्रांतिकारक म्हणविणार्‍या मार्क्सवाद्यांनी व समाजवाद्यांनी त्याकडे  अक्षम्य दुर्लक्ष्य केलं. त्यामुळे जातिअंताचे लढे जातसंघटनांच्या बॅनरखाली लढले जाऊ लागले. रिडल्स, नामांतर, मंडल आयोग ही त्याची उदाहरणे होत. त्यामुळे जातसंघटनांना पुरोगामित्व लाभत गेले व त्यांचे उदात्तिकरण होऊ लागले. हे लढे जातीअंतक म्हणून क्रांतिकारक असूनही सत्ताधार्‍यांना लाभदायक ठरत होते. या लढ्यांतून निर्माण झालेले नेतृत्व प्रस्थापित-सत्ताधार्‍यांशी संघर्ष करीत मोठे झालेले दिसत असले तरी ते प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांनीच ‘लॉंच’ केलेले नेतृत्व होते की काय अशी शंका घ्यायला जागा राहते. कारण हे नेतृत्व सहज व बेमालूमपणे प्रतिक्रांतीकारकांच्या छावणीत जाते. आणि मजेची गोष्ट म्हणजे ते प्रतिक्रांतिकारकांच्या छावणीत असूनही त्यांच्या कपाळावरचा पुरोगामित्वाचा शिक्का पुसण्याची कोणी हिम्मत करू शकत नाही. कधी पुलोआ, तर कधी डालोआ च्या नावाने डावे या नेत्यांशी युती करण्यासाठी उत्सुक असतात.
मंडल आयोगाचा लढा तर जातीव्यवस्थेच्या पेकटात निर्णायकपणे लाथ हाणणारा लढा होता. आजही तो तेवढ्याच क्रांतीकाराक मार्गाने लढला जाऊ शकतो. या लढ्याचे क्रांतीकारक पोटेन्शियल पाहता सर्वच प्रतिक्रांतीकारक पक्ष-संघटनांनी 1985 पासूनच आपापले ‘ओबीसी नेते’ लॉंच करायला सुरूवात केली. ज्या पक्षांकडे लॉंच करण्यासाठी ओबीसी नेते नव्हते त्यांनी मंडल आयोग लागू होताच दुसर्‍या पक्षाकडून ते आयात केले. प्रत्येक जातीलढ्याचा लाभ अंतिमतः प्रस्थापित छावणीलाच का होतो, याचे आत्मपरिक्षण करण्याची तसदी डाव्यांनी कधीच घेतली नाही व आजही ते घेत नाहीत. जातीचा प्रश्न सत्तरीनंतर तीव्र व्हायला लागला. नेमका याच काळापासून शपांचा ‘वर्गजातस्त्रिदास्यअंतक’ माफुआ आकार घेत होता. हा काही योगायोग नव्हता, काळाची गरज म्हणून ती काळाचीच निपज होती, एव्हढेही डायलेक्टिक्स-ज्ञान भारतीय मार्क्सवाद्यांकडे नसेल तर ते कसली क्रांति येथे करणार आहेत?   विशेष महत्वाची बाब ही की, कट्टर वर्गीय सनातनवाद जोपासणार्‍या सीपीएमच्या गर्भातच हे जातिअंताचे तत्त्वज्ञान जन्म घेत होते. सीपीएमने त्याचे नैसर्गीक बाळंतपण नाकारल्यामुळे माफुआला पोट फाडूनच बाहेर यावे लागले. कालचे हे अर्भक आज सौत्रांतिक मार्क्सवादाच्या रूपाने तरणेताठे झाले आहे, जातीव्यवस्थेचा प्रश्न जसजसा तीव्र होत जाईल, तसतसा या तत्त्वज्ञानाला मान्यता मिळत जाईल.
माझ्या दृष्टिने संघर्षाच्या व्यवहारिक पातळीवरचा माफुआचा सर्वात महत्वाचा सिद्धांत हा – ‘वर्गीय संघटनांच्या माध्यमातूनच जातीलढा’! पद्मभूषण कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जातीय पायावरच्या वर्गीय लढ्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वर्गीय पायावरच्या जातीलढ्याचाच पर्याय शिल्लक होता, जो शपांनी शास्त्रशूद्ध पद्धतीने मांडलेला होता.


'योध्‍दा' संशोधक!
दिनेश पाटील|Mar 23, 2014, 06:40AM IST

इतिहास मरत नसतो; चुकीच्या आकलनातून तो प्रेरक न बनता बाधक बनतो, ही भूमिका घेऊन भारताच्या इतिहासाची युगप्रवर्तक पुनर्मांडणी करणा-या कॉम्रेड शरद पाटील यांना अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदेचा पहिला वा. सी. बेंद्रे (बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखनाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखनात विकसित केला.) पुरस्कार जाहीर झाला. ही महत्त्वाची घटना आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला अ‍ॅकॅडेमिक मान्यता मिळत आहे. गेली 40 वर्षे एक जीवनदायी कार्यकर्ताम्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रांत अखंडपणे कार्यरत असणा-या शरद पाटलांना अवहेलना, द्वेष आणि मानहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक जैविक विचारवंतही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.

बडोद्याचे जागृतिकार भगवंतराव पाळेकर नात्याने आजोबा, तर वडील धुळे जिल्ह्यातील पहिल्या पिढीतील सत्यशोधक होते. यामुळे घरातच सत्यशोधकी विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. 1964-65च्या चीन युद्धादरम्यान तीन वर्षे स्थानबद्धतेत तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सचा कॅपिटलहा महाग्रंथ समजून घेतला. या ग्रंथाच्या दुस-या खंडातील मार्क्सने सोडविलेले एक गणित चुकीचे असल्याचे त्यांनी कॉ. बी. टी. रणदिवेंना पत्राने कळवले. मार्क्स चुकला आहे, इतक्या खोलवर विचार कुणी केला नाही’, असे उत्तर आले. मार्क्सही चुकू शकतो, हे सांगत त्यांनी मार्क्सभक्तीचे झापड बाजूला सारले. भारतीय समाज आणि इतिहास हा फक्त मार्क्सच्या मदतीने समजून घेता येणार नाही, याची खात्री पटल्याने त्यांनी स्वतंत्र लेखन करण्याचे ठरवले. यासाठी वैदिक वाङ्मय मुळातून वाचायचे आणि त्यासाठी वैदिक संस्कृत शिकायचे, या हेतूने 1966मध्ये ते बडोद्याला गेले. इतिहास हा नेहमीच सांस्कृतिक राजकारणातील महत्त्वाचे शस्त्र म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन्ही गटांकडून वापरला जाणार; परंतु अँतोनिओ ग्रामसी ज्यांना वंचितम्हणतो, त्या सर्वहारांचा सशक्त इतिहास भक्कम पुराव्यांच्या आधारे पुढे आणून सांस्कृतिक राजकारणाची लढाई लढण्यासाठी आवश्यक सांस्कृतिक भांडवलशरद पाटलांच्या इतिहास संशोधनातून सर्वहारांकडे उपलब्ध आहे. म्हणून शरद पाटील नेहमी म्हणतात, ‘मी समतावादी समाजाच्या उभारणीचे शस्त्रागार तयार केले आहे, त्याचा वापर नव्या पिढीने करावा.शरद पाटलांनी इतिहासाला काय योगदान दिले, याचे उत्तर असे की, त्यांनी इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक नव्या संकल्पना, अन्वेषणशास्त्र आणि माफुआ ते सौतांत्रिक भौतिकवाद असे सैद्धांतिक योगदान दिले. राम आणि कृष्ण यांची भारताच्या इतिहासातील भूमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्यांचे ऐतिहासिक महत्त्व, असे अनेक मूलभूत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फुले-आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुधा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षांचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. 1957 ते 1971 अशी 14 वर्षे संशोधन करून दासशूद्रांची गुलामगिरीहा बुद्धकाळापर्यंतचा इतिहास ग्रंथ त्यांनी लिहिला. जातिव्यवस्था व सामंती सेवकत्वहा तुर्काच्या काळापर्यंतचा इतिहास लिहिला. दिग्नाग स्कूलचे सौतांत्रिक विज्ञानवाद व अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ही जाती व्यवस्थान्तक संघर्षाची अन्वेषण पद्धती   वापरून जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्तीहा ग्रंथ प्रकाशित केला. तर, या महाप्रकल्पातील शेवटचा खंड निऋती व हरिती यांची स्त्री राज्य ते भारताचा समाजवादप्रसिद्धीच्या मार्गावर आहे. शिवाजी-संभाजीची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, या चिकित्सेतून शिवाजी-संभाजीच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. पाटलांनी त्यांच्या शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण-महंमदी की ब्राह्मणी?’ या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषण पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले.

या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्‍ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर  कडवे आव्हान उभे केले. महाराष्‍ट्राची अस्मिता असणा-या शिवाजीच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. त्याचप्रमाणे महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळींची चिकित्सा करताना ते म्हणतात, ‘महाराष्‍ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळीत पुढाकार घेणा-या कुणबी जातींनी, जातिव्यवस्था विरोधाला तिलांजली देऊन राष्‍ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि प्रमुख अस्पृश्य जात, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जातिव्यवस्था विरोधार्थ स्वतंत्रपणे संघटित झाल्यामुळे कुणबी जात व ही अस्पृश्य जात यांची विरोधी एकजूट पुन्हा वैमन्यसभावी बनली.त्यांचा हा निष्कर्ष आज परिवर्तनवादी चळवळी क्षीण का होत आहेत, याचे उत्तर देतो. याबरोबरच अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्रया ग्रंथाने संस्कृतीतील सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भांत अधोरेखित केले. मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत ग्रामीण दलित आदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी वर्गजातिस्त्रीदास्यांताच्या लढ्यांना अग्रक्रमाने समजावून घेत माफुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकूणच भारतीय इतिहास याकडे पारंपरिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी दृष्टीने पाहिले. याचे कारण असे, की फक्त मार्क्सवाद, फुलेवाद किंवा आंबेडकरवाद हे दृष्टिकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादही अन्वेषण पद्धती अधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषण पद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात. संस्कृत, प्राच्यविद्या आणि तत्त्वज्ञान या तिन्ही शाखांचा व्यासंग आणि सर्वहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशोधकाची दृष्टी अधिक व्यापक, मूलगामी झाली आहे. त्यांच्या मते, ‘बुद्धाचा धम्म वर्ण व्यवस्था अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक होता. पण आंबेडकरांनी त्याला सर्व विषमता अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक मानला.शरद पाटलांचा हा सिद्धांत समकालीन दलित चळवळींच्या संदर्भांत तपासला असता, दलित चळवळ जातीअंताचा प्रश्न आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे हाताळण्यामध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर मिळते. त्याचप्रमाणे धर्मांतराने जातीअंताचा प्रश्न सोडवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न अपुरा का ठरला, या प्रश्नाचे आकलन होते. जातहा घटक केंद्रस्थानी ठेवून आधुनिक भारताचे जे इतिहासलेखन शरद पाटील यांनी केले आहे, त्यातून अनेक नवीन तपशील व अन्वयार्थ पुढे येतात. शरद पाटील लिहितात की, ‘फुले या शूद्राने व आंबेडकर या अतिशूद्राने व्यक्तिस्वातंत्र्याचा निकराने पाठपुरावा केला, याचे कारण जात्यन्ताची चळवळ व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय प्राप्त होऊ शकत नव्हती. फुले-आंबेडकरांनी म्हणून जात्यन्तानंतरच्या स्वातंत्र्याला राष्‍ट्रीय स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानले.अशा प्रकारे फुले आणि आंबेडकरांचा अग्रक्रम हा जात्यन्तक स्वातंत्र्याला होता, हे पाटील स्पष्टपणे नोंदवतात. आपण दासशूद्रांची गुलामगिरीया ग्रंथाचे लेखन विधायक अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीने केले आहे, असे सांगून पाटील म्हणतात की, अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीचे जनक फुले असून तिचा विकास आंबेडकरांनी केला. माफुआ ही अन्वेषणपद्धती घेऊन शरद पाटील यांनी आधुनिक भारतातील इतिहासाच्या आकलनात महत्त्वाची भर घातली आहे. जात हा स्वातंत्र्यलढासमजावून घेण्याचा महत्त्वाचा निकष आहे, असे मानून त्यांनी वासाहतिक काळाचे विश्लेषण केले आहे. शरद पाटील म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा बाह्यसंघर्ष ब्रिटिश साम्राज्यशाही व हिंदी उच्चजातीय-वर्गीय राष्‍ट्रवादी, यांच्या नेतृत्वाखालील हिंदी जनता यांच्यातला असला, तरी आंतरिक संघर्ष उच्चजातीय, वर्गीय, राष्‍ट्रवादी व शुद्रातिशूद्र जातीय-वर्गीय, जात्यन्तवादी यांच्यातला होता.आज महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत विविध ठिकाणी कार्यरत असणारे असंख्य कार्यकर्ते तसेच लेखक-विचारवंतांचा फार मोठा समूह असा आहे, जो त्यांचे लेखन वाचून, त्यांच्या अभ्यासवर्गातून, त्यांच्या चळवळीतून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून घडला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय लोकशाही क्रांतीचे स्वप्न रुजविण्याचे श्रेय कॉम्रेड शरद पाटील यांचे आहे.





क्रांतिकारी विचारवंत (अग्रलेख)
दिव्य मराठी|Apr 14, 2014, 04:00AM IST


सत्यशोधक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, इतिहासाचे साक्षेपी संशोधक, क्रांतिकारी विचारवंत, प्राच्यविद्यापंडित अशी अनेक नामाभिधानं  ज्यांच्या नावाआधी लावली जात होती ते कॉम्रेड शरद पाटील वयाच्या नव्वदाव्या वर्षी शनिवारी हा इहलोक सोडून गेले. गेली काही वर्षे नेहमीच आजारी राहत आलेले कॉम्रेड अनेकदा मृत्यूच्या दारातून परतलेही होते. काही दिवसांपूर्वीच धुळ्यात त्यांच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यातूनही ते बाहेर आले होते. त्याच काळात त्यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला बा. सी. बेंद्रे इतिहासकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण कोणापुढेही हार न मानणार्‍या या सत्यशोधकाला अखेर मृत्यूपुढे हार पत्करावी लागली. कॉम्रेड शरद पाटील हाच एक आता इतिहास झाला आहे. हा इतिहास मात्र सर्वसाधारण इतिहास नाही. हा वैचारिक क्रांतीच्या मशालीचा धगधगता इतिहास आहे. जगभरातल्या सर्वच तत्त्ववेत्यांना अचंबित करणारा देदीप्यमान इतिहास आहे आणि जातिअंताच्या लढ्याचा काळ्या दगडावरच्या रेषेचा न पुसता येणारा इतिहास आहे. धुळे जिल्ह्यातल्या कापडणे या क्रांतिकारकांच्या गावचा वारसा लाभलेल्या या वैचारिक क्रांतिकारकाने तत्त्ववेत्यांचे सर्व परंपरागत मार्ग उखडून टाकले होते.

जगातल्या प्रमुख वादांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करून त्यांनी आपला स्वत:चा असा एक वादजगाला दिला आहे; पण जगाच्याच काय, राष्ट्रीय पातळीवरही या माणसाच्या पारड्यात त्याच्या त्या मोठेपणाचं योग्य माप पडलं नाही, याची खंत त्यांच्या अनुयायांना नक्कीच वाटत राहणार आहे. कॉम्रेड शरद पाटलांच्या हयातीत आणि त्यांच्या उमेदीत अनेक वैचारिक वाद आणि तंटे त्यांनी ओढवून घेतले होते. अर्थात, सत्याच्या शोधाची जिद्द आणि सापडलेले सत्य प्रभावीपणे मांडण्याचा, ते पटवून देण्याचा आग्रह यातून हे वैचारिक तंटे उभे राहिले होते. अशा वादात आणि सत्य-असत्याच्या मांडणीत त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. ज्या मार्क्सच्या वैचारिक प्रभावाखाली येऊन त्यांनी आयुष्यभर तो विचार अंगीकारला, त्याच मार्क्सच्या दास कॅपिटलया ग्रंथातील उणिवा दाखवून द्यायलाही ते कचरले नाहीत. त्या संदर्भातल्या त्यांच्या विश्लेषणामुळे अनेक दिग्गज मार्क्सभक्तांना धक्का बसला होता. त्यांच्या टीकेचे धनी त्यामुळे शरद पाटलांना व्हावे लागले होते. अर्थात, टीका आणि वादांना कचरतील ते कॉम्रेड शरद पाटील कसले! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव नंबुद्रीपाद यांना त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाच्या बाबतीत माझा अधिकार तुमच्यापेक्षा मोठा आहेअसे सुनवायलाही कमी केले नव्हते. मार्क्सवादी जातिअंताची लढाई लढायला नाही म्हणतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच फारकत दिली आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. यालाच ते सौत्रांतिक कम्युनिस्ट पक्ष म्हणत असत, असं त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात.

या पक्षाचा विस्तार किती झाला, यापेक्षा त्याची सैद्धांतिक बैठक काय होती, हे अधिक महत्त्वाचे आहे. वर्गवाद आणि जातीयवादाचा अंत झाल्याशिवाय दासशूद्रांची आणि महिलांची खर्‍या अर्थाने गुलामगिरीतून सुटका होणार नाही, हे ते ठामपणे सांगत होते. हे सांगण्यासाठीच त्यांनी रामायणाची आणि महाभारताचीही कठोर चिकित्सा केली होती. हे दोन्ही ग्रंथ वर्णसंघर्षावर आधारित आहेत असं त्यांचं प्रतिपादन होतं आणि त्यासाठी त्यांनी याच दोन्ही ग्रंथांतील अनेक दाखलेही दिले होते. केवळ रामायण, महाभारतच नाही तर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या शत्रूंनाही उघडे पाडण्याचे काम त्यांनी ग्रंथांतून आणि भाषणांतून आयुष्यभर केले. ते ब्राह्मणांचे नव्हे, ब्राह्मण्याचे शत्रू होते आणि म्हणूनच ब्राह्मण्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. समाजसुधारणेत शाहू महाराजांना ते आदर्श मानत असत आणि इतर कोणत्याही राजाच्या तुलनेत शाहू महाराजच श्रेष्ठ कसे होते हेही ठामपणे सांगत. पूर्वीच्या धुळे आणि आताच्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी आदिवासींसाठी काम सुरू केले होते. ते करताना त्यांना अनेक वादांना आणि हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलं; पण म्हणून त्यांनी माघार कधी घेतली नाही. जे करायचं ते मनापासून आणि मुळापासून, हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच इयत्ता सहावीत शिकत असताना त्यांनी  शेक्सपिअर वाचून काढला होता. वेदांचा आणि त्यासाठी संस्कृत भाषेचाही त्यांनी ऐन किशोरवयात अभ्यास केला होता.

त्या अभ्यासातून त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आला होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच ते आपल्या मतांवर ठाम राहत होते. हा संस्कार त्यांच्यावर शालेय शिक्षकांनी केला आणि त्यामुळेच आपल्या जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव पडला, असं ते सहज मान्य करीत असत. सत्यशोधनाचा संस्कार त्यांच्या वडिलांनी केला. वडील सत्यशोधक चळवळीत तर आई बडोद्यात शिकलेली. त्यामुळे आपल्याला बुद्धिप्रामाण्याचे बाळकडू घरातच मिळाले, असेही त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आपल्या तत्त्वांशी घट्ट चिकटून राहण्याच्या संस्कारांमुळे आईच्या अंत्यसंस्कारालाही ते गेले नाहीत. कारण त्यासाठी त्यांना तुरुंगातून जामीन मागावा लागणार होता. नामांतर चळवळीत त्यांना अटक झाली होती आणि जामीन मागायचा नाही असा निर्णय नामांतरवाद्यांनी घेतला होता. त्या निर्णयापासून ते इतक्या दु:खातही ढळले नाहीत याचा त्यांच्या अनुयायांवरच नाही तर एकूणच कम्युनिस्ट चळवळीवर मोठा प्रभाव पडला होता; पण तो प्रभाव आदर आणि कुतूहलापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यांच्या पासंगाला पुरेल असा एकही अनुयायी आज त्यांच्या पश्चात दिसत नाही, ही या जिवंत दंतकथेची शोकांतिका आहे.



एका कॉम्रेडची साद ...
Published: Monday, April 14, 2014

'आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे' या समर्थवचनाचा विसर न पडू देता कॉ. शरद् पाटील यांचे लिखाण वाचले पाहिजे. पाटील हे आंबेडकरविरोधी होते की ब्राह्मणविरोधी की मार्क्सयविरोधी, यापेक्षा ते जात्यंतक प्रबोधनवादी होते, हे महत्त्वाचे ठरावे..

आपल्याकडे विचारवंतांनी वैचारिक ऊर्जेच्या निर्मितीत कसूर ठेवलेली नाही; परंतु या वैचारिक ऊर्जेचा प्रसार मात्र एखाद्याच व्यक्तिकेंद्री, पंथवादी संघटनेपुरता मर्यादित राहिल्याची खंत उरते किंवा त्या वैचारिक ऊर्जेवर भलत्याच लोकांनी आपापले आकडे टाकून तिचा गैरवापर केल्याचे चित्र दिसते. हे असे महाराष्ट्रात वारंवार घडल्याने यातून विचारवंताचा पराभव झाला असे मानायचे का यावरील खलच अधिक वाढत जातो. असा खल करणारे हास्यास्पद ठरतात. याचे कारण असे की, विचारवंताच्या हयातीसोबत जणू सारे संपलेच, असे गृहीत या व्यर्थ चर्चामागे असते. यातून उघड होते ती चर्चा करणाऱ्यांची पराभूत मानसिकता. प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सीवादी पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद् पाटील यांच्या निधनानंतर जी चर्चा होईल, ती तरी अशी होऊ नये. उलट, पाटील यांच्या निधनानंतर 'श्रद्धेच्या ओंजळी' वाहून मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक मांडणीची आणि या विचारांच्या प्रसार-अपप्रसाराची चर्चा करण्यात मराठीजनांना रस आहे, हे महत्त्वाचे मानले जावे. परंतु तसे होणार नाही. शरद् पाटील यांचे लिखाण आम्ही वाचलेच नाही असे सांगणारे भरपूर आणि पाटील यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या सातपैकी दोन-तीन पुस्तके वाचूनसुद्धा पाटील यांच्यावर बुद्धविरोधी, ब्राह्मणविरोधी, मार्क्सतविरोधी, आंबेडकरविरोधी, असा कोणताही एक शिक्का मारण्यास उत्सुक असलेलेही कमी नाहीत. त्यामुळेच पाटील यांच्या निधनानंतर तरी त्यांना समजून घेतले जावे, ही अपेक्षा मुद्दामहून मांडावी लागते. भारतीय इतिहासाचे अधिक मूलगामी अर्थ लावण्याची कॉ. पाटील यांची तळमळ त्यांना दामोदर धर्मानंद कोसंबी किंवा लोकायतकार देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या पंक्तीत नेऊन बसविणारी आहे. त्यामुळे पाटील हे केवळ महाराष्ट्राचे ठरत नाहीत. परंतु चट्टोपाध्याय किंवा कोसंबी यांच्याहीपेक्षा एका भाषक समाजाची- महाराष्ट्रीय समाजाच्या ताण्याबाण्यांची जाण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील एक सैनिक, एक मार्क्सषवादी कार्यकर्ता आणि पुढे इतिहासतज्ज्ञ- विचारवंत अशी ओळख असलेल्या पाटील यांना होती. हे प्रादेशिकत्व मोलाचेच आहे.

कम्युनिस्ट पक्षातील १९६४च्या फुटीपूर्वीपासून पाटील त्या पक्षात होते. त्यापुढील १४ वर्षे मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षात राहून अखेर १९७८च्या ऑक्टोबरात त्यांनी स्वत:च्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने या पक्षाची संभावना 'दोन तालुक्यांपुरता पक्ष' अशी केली होती. परंतु हा पक्ष फारसा सत्ताकांक्षी नव्हताच आणि त्याचे नेते शरद् पाटील हेदेखील रूढार्थाने नेते नसून विचारवंतच होते. कम्युनिस्टांनी भारतीय समाजाचे वर्ण-जाती संदर्भ जसे समजून घ्यावयास हवे होते तसे कधीच घेतले नाहीत, या घुसमटीची पराकोटी म्हणजे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. हे संदर्भ समजण्यासाठी, इतिहासातील एकेका घटनेचे खरेखोटेपण तपासण्यात धन्यता मानण्याऐवजी इतिहासाची सामाजिक, राजकीय आदी अंगे तपासून त्यांचा अन्वयार्थ लावण्यावर पाटील यांनी भर दिला. अन्वयार्थ का लावायचा, याबद्दल कॉ. पाटील यांची दृष्टी स्वच्छ होती. जे दिसते ते क्षणिक सत्य असू शकते, त्यामुळे नेणिवेच्या पातळीवर जे समजते त्याचा व दिसणाऱ्या सत्याचा एकत्रितच विचार केला पाहिजे, ही शिकवण त्यांनी सुमारे साडेचौदाशे वर्षांपूर्वीचा बौद्ध दार्शनिक दिग्नाग याच्याकडून घेतली. दिग्नागाचे हे सौत्रांतिक दर्शन पाटील यांनी समाजकेंद्री प्राच्यविद्या व सामाजिक इतिहासलेखनातील एक प्रमाणशास्त्र किंवा एपिस्टेमॉलॉजी म्हणून विकसित केले. पाटील यांच्याशी अनेकांचे, अनेक विषयांबाबत वाद झाले, ते याच प्रमाणशास्त्रामुळे. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षालाच सौत्रांतिक प्रमाणशास्त्रातून आलेल्या संशोधनपर अन्वयार्थाची बैठक दिली. त्याआधी मार्क्स वादाला फुले, आंबेडकरवादाची जोड द्यायला हवी असे ते म्हणत होते. हा त्यांचा मार्क्सु-फुले-आंबेडकर (माफुआं)वाद. मात्र उत्तरायुष्यात, माफुआंवादाच्याही मर्यादा जाणवल्याने आपण सौत्रांतिक समाजवादाची मांडणी करीत आहोत असे पाटील म्हणाले आणि त्यांच्या विरोधकांत भरच पडली. सौत्रांतिक समाजवादी मांडणीतील कच्च्या दुव्यांची चर्चा यापुढेही होत राहील; परंतु पाटील यांचे वाद झडले ते या मांडणीतून कुणाचे तरी महत्त्व नाकारले जाते म्हणून. स्त्रीसत्ताक गणसमाज हा 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम'चा पाया आहे, असे पाटील म्हणाल्याने एकाच वेळी नवबौद्ध आणि कम्युनिस्ट, दोघांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्यापूर्वी -राज्याभिषेकापूर्वी- केलेला आंतरजातीय विवाह हा खरे तर शाक्तपंथाचा दीक्षाविधी होता, शिवरायांच्या किल्ल्यांवर सर्व जातीजमातींचे लोक असणे हे केवळ वैचारिक उदारतेचे लक्षण नसून प्रचलित (ब्राह्मणी) सामाजिक उतरंडीशी जाणीवपूर्वक केलेला तो संघर्ष होता, असे अन्वयार्थही पाटील यांनी मांडले.


यापैकी सोयीचे तेवढेच त्या-त्या अनुयायांनी किंवा अस्मितावाद्यांनी स्वीकारले. एरवी, पाटील यांचे अन्वयार्थ गैरसोयीचे वाटावेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका व्हावी हाच क्रम सुरू राहिला होता. पाटील यांच्या या मांडणीमागची जात्यंताची कळकळ समजून घेण्याची तसदी यापुढे तरी घेणे आवश्यक आहे. हयात असताना पाटील यांचे सहा फुटी करारी व्यक्तिमत्त्व, अनेक संकल्पनाव्यूहांचे त्यांना असलेले अंतर्बाह्य़ आकलन, शब्दांवरील त्यांचे प्रभुत्व आणि एवढे असूनही वादांमध्ये स्वत:ची बाजू मांडताना विरोधकाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षही करण्याची त्यांची हातोटी, आदी वैशिष्टय़ांमुळे पाटील यांचे आव्हानच मोठे होते आणि ते स्वीकारण्याच्या ऊर्मीपायी अनेकांनी त्यांच्याशी वाद घातले. आता पाटील नाहीत, त्यामुळे अशा वादांतील लौकिक हारजितीचा मुद्दा संपुष्टात आला आहे. पाटील यांची बाजू विरोधकांनीही आधी समग्रपणे समजून घ्यावी यासाठी हे कारण पुरेसे आहे.
अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हा पाटील यांचा ग्रंथ हे लेखसंकलन आहे. कोसला ही कादंबरी, उत्सव हा चित्रपट, हयवदन हे नाटक अशा गाजलेल्या कलाकृतींवर पाटील यांनी लिहिलेले लेख या संग्रहात आहेत. प्राध्यापकी थाटा-घाटात घुटमळत राहिलेली मराठी समीक्षा वाचण्याचा कंटाळा कुणालाही येतो, तसे या संग्रहाचे होत नाही. वैचारिक साधने दूरची असोत वा जवळची, इतिहासातील असोत वा आत्ताची, त्यांची सांगड घालणारा विचारव्यूह या लिखाणाने रचला आहे. आपण पाहातो कसे, आपल्याला साहित्याकडून काय हवे असते आणि आपल्या सौंदर्यकल्पना आज जशा आहेत त्या तशाच का आहेत, हे प्रश्न वाचकाला या पुस्तकातून पडतात आणि तो सुजाण होतो. भारतीय समाज कसा घडला, मातृसत्ताक व्यवस्थेपासून ते मुसलमानी आक्रमणांच्या आधीपर्यंतच्या बहुधर्मीय भारतीय समाजाचे पितृसत्ताक जाती-वर्णामध्ये कसे होत गेले, वर्ण आणि वर्ग हे भारतीय संदर्भात एकच मानावेत काय आणि जातिअंताच्या सांघिक कृतींचा पराभव भारतीय समाजाने कसकसा केला, अशा अनेक प्रश्नांपर्यंत पाटील यांच्या अन्य पुस्तकांचे वाचक जातात, यापुढेही गेले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाटील यांच्या साथीने शोधायची तर आपापले राजकारण, आपापल्या अस्मिता हे जरा बाजूला ठेवावे लागेल. परंतु मराठीजनांची स्थिती अशी झालेली आहे की अब्राह्मणी हा शब्द आला रे आला की हे काही तरी ब्राह्मणविरोधी असणार, अशा वैचारिक भिंती तयार होतात. 'आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे' या समर्थवचनाचा विसर अशा वेळी पडतो आणि आपणच जपत असलेल्या दुहीचे आपल्याला काही वाटेनासे होते, असा आजचा काळ आहे. या दुहीमुळे कॉ. शरद् पाटील यांच्या लेखनातील सत्त्वाकडे त्यांच्या हयातीतही लोकांनी सर्वस्तरीय दुर्लक्ष केले.

यापुढेही हे दुर्लक्ष सुरूच राहण्याचा धोका आहे. शिवाजी-संभाजीचा शाक्तपंथ सांगणारे पाटील एका जातीला नको असतील, तर कम्युनिस्टांचा ब्राह्मणीपणा उघड करू पाहणारे पाटील आणखी एका जातीला. तरीही आपण  जातवादी नाही, हे सांगण्यास सारे तयारच. अशा कठीण काळातही पुस्तकरूपाने शरद् पाटलांसारखा कॉम्रेड -साथी, सहकारी, सहप्रवासी- आपल्या वैचारिक प्रवासाला सत्यशोधनाची साद घालत राहणार आहे. ती आपण ऐकायला हवी.

2 comments:

  1. टिनपाट बामण मेल्यावर भाडखाऊ मिडिया देश्यावर शोककळा पसरली पाहिजे आश्या पद्धतीने बातम्या दाखवतात. त्याचं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी नेत्यांवर प्रशासनावर "मिडिया दहशतवाद" दाखवून दबाव टाकतात हाच न्याय संपूर्ण जगाने मान्य केलेल्या बहुजन समाजातील लोकांना का लावला जात नाही ??? ना त्यांना भरभरून प्रसिद्धी दिली जाते ना त्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केला जातो न त्यांना कुठला मोठा पुरस्कार दिला जातो !!
    विचार करा ??? आसं का ???
    जागतिक इतिहास संशोधक ' काँ. शरद पाटील ' यांचे दुःखद निधन.
    त्यांच्या विचारांना & कार्याला विनम्र अभिवादन.
    प्रस्थापित ब्राह्मणांनी लिहीलेल्या इतिहासाला धक्के देत सत्य इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक
    महान प्राच्यविद्या पडित, मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादाचे प्रणेते, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉमरेड शरद पाटिल यांचे आज रात्रि 10 वाजता धुले येथे निधन। रविवारी दुपारी 12 वाजता धुले येथे अंत्यसंस्कार होणार।
    ' Dilactical Logic ' ही संकल्पना बुद्धांनंतर पहिल्यांदाच मांडणारे डॉ. शरद पाटील यांचा गौरव रशिया व चीन ने केला.
    धुळे शहराने अखिल मानवजातीला दिलेला एक अनमोल हिरा ..!!
    भावपूर्ण आदरांजली !!
    ---- संभाजी ब्रिगेड

    ReplyDelete
  2. शपा तात्या यांचे साहित्य अभ्यासासाठी मिळेल का
    अॅड प्रमोद दि तडाखे रा मलकापुर नगरपरीषद जवळ ता कराड जि सातारा 7499059587
    मी जो खर्च असेल तो देणेस तयार आहे मला माझ्या समाज्याची दैनीय अवस्था पाहत नाही पुस्तक रुपातील मिळावे अथवा पीडीएफ स्वरूपात मिळावे माझा whatsap no 7499059587 असा असुन pamaspaisa@gmail.com तरी मला साहित्य उपलब्ध करुन द्यावे हिच विनंथी

    ReplyDelete