डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म्हणतात-‘विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मुल है’ अर्थात विचार परिवर्तन हेच
सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ आहे. म्हणून सामाजिक,धार्मिक,राजकीय परिवर्तन
करण्याआधी विचार परिवर्तन करावे लागतेच. संत तुकारामांनी सामाजिक व धार्मिक
परिवर्तन केल्यानंतर शिवरायांनी राजकीय परिवर्तन केले. स्वराज्य निर्मितीच्या आधी
विचारांची निर्मिती केली म्हणूनच हजारो मावळे जीवावर उदार होऊन मारण्यास आणि
मारण्यास तयार झाली. परंतु दुर्दैवाने आज आपण शिवरायांचा हा विचारच विसरून गेलो
आहोत.
हा विस्मरणात गेलेला विचार
समाजापुढे आणण्यासाठी डॉ.बालाजी जाधव यांनी ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हे पुस्तक
लिहिले. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिवरायांचे विचार किती महान होते, या
विचारांचे अवलोकन करून मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले,
शिवरायांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन भारत आणि जगातील बऱ्याच लोकांनी आधुनिक
काळात कसे पराक्रम घडवले व आज आपणही शिवरायांच्या याच विचारांपासून प्रेरणा घेऊन
कसे उज्वल भविष्य घडवू शकतो हे सांगण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न निस्वार्थ
भावनेने केलेला आहे.
नात्यापेक्षा विचार कसा
मोठा असतो हे सांगत असताना डॉ.जाधवांनी हंबीरराव मोहितेंचे जे उदाहरण दिलेले आहे
ते आजच्या काळात सर्वांनाच प्रेरणादायी ठरते. ‘मराठ्यांची इज्जत वाचणार नाही’ या
तिसऱ्या प्रकरणात रयतेला काडीचाही आजार द्यायचा नाही असा आदेश देणाऱ्या पत्रातील
अत्यंत महत्वाचा मजकूर डॉ.बालाजी जाधव यांनी सदरील पुस्तकात मांडलेला आहे.
समाजातील वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढत असताना नेमके तसेच वर्तन आपल्याकडूनही घडू
नये याची काळजी शिवरायांना मानणाऱ्या आजच्या सर्वांनी घेतली पाहिजे असे स्पष्टपणे
डॉ.बालाजी जाधव यांनी लिहिलेले आहे.
एक मराठा लाख मराठा, संभाजी
राजेंच्या संस्कृत लेखनाचा अन्वयार्थ, नामर्द दैववादी, इत्यादी लेखांच्या
माध्यमातून त्यांनी २१ व्या शतकाला साजेसे विचार मांडलेले आहेत. त्यातही नामर्द
दैववादी या लेखातून डॉ. जाधव यांनी आजच्या तरुणांना प्रयत्नवादी व्हा असा जो सल्ला
दिलेला आहे तो खूपच मौल्यवान आणि कौतुकास्पद आहे. दैववादी तरुणांना प्रयत्नवादी
बनवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून व्याख्याने देणाऱ्या डॉ. जाधव यांनी आपल्या
लेखणीच्या माध्यमातूनही हे महान कार्य सुरूच ठेवले आहे.
‘पर्यावरण खात्यानेच
उभारावे शिवस्मारक’ या पुढील लेखात शिवरायांच्या भव्य स्मारकास विरोध करणाऱ्या
पर्यावरण खात्यास अतिशय प्रखर शब्दात डॉ.बालाजी जाधव यांनी सुनावले आहे नव्हे
शिवरायांचा पर्यावरण विषयक दृष्टीकोन मांडून पर्यावरण खात्यानेच शिवरायांचे स्मारक
उभारणे कसे संयुक्तिक ठरते हेही दाखवून दिले आहे.
पाकिस्तानात शिवराय,
अमेरिकेत शिवराय इत्यादी लेख वाचून कोणताही वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
सांबर या पदार्थाचे संभाजी या नावाशी असणारे साधर्म्य आणि त्याचा मराठ्यांनी
लावलेला शोध ही तर अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान माहिती डॉ. बालाजी जाधव यांच्या
पुस्तकातून मिळते. या पुस्तकातील अतिशय महत्वाचा आणि मला भावलेला लेख म्हणजे
‘तारुण्य: उद्योग करून तमासे दाखवण्याचे वय’ हा आहे. डॉ. जाधव यांनी हा लेख लिहून
बुडत्या तरुणाईला रोखण्याचे आणि त्यांच्या समोर शिव आदर्शाचा एक नवीन मार्ग ठेवलेला
आहे असेच म्हणावे लागते.
पुस्तकातील शेवटचा लेख
म्हणजे ‘व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय’. आज पर्यंत मी या विषयी खूप काही ऐकून
होतो. व्याख्याना मध्ये कित्येक वेळेस मी या गोष्टींचे उदाहरण देखील दिलेले आहे.
परंतु याबाबत मला सविस्तर अशी माहिती कुठेही मिळाली नव्हती. जाधव सरांचे हे पुस्तक
माझ्या हाती आले तेव्हा मला व्हिएतनामच्या संदर्भात पूर्ण, सखोल आणि गौरवशाली
इतिहास समजला.
‘शिवरायांचा आठवावा विचार’
या पुस्तकातील डॉ. बालाजी जाधव यांनी लिहिलेले १५ ही लेख मेंदू आणि मनाला स्पर्श
केल्या शिवाय राहत नाहीत. येणाऱ्या काळात देशामध्ये समता, बंधुता, न्याय व
स्वतंत्रता या गोष्टींना रुजवत पुन्हा या मातीत शिवराज्याची निर्मिती करावयाची
असेल तर स्वाभिमानी, स्वावलंबी आणि निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या प्रत्येक
कार्यकर्त्यास डॉ. जाधव यांच्या या पुस्तकातून प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. बालाजी जाधव यांनी
इतिहास संशोधन करून शिवरायांचे अनमोल विचार समजा समोर मांडत आम्हाला शिव विचारांचे
महत्व पटवून दिले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीस
शिवेच्छ्या.
-इंजी स्वप्नील घुमरे पाटील
पुस्तकाचे नाव:
शिवरायांचा आठवावा विचार
लेखक-डॉ.बालाजी जाधव
पाने- ८८
मूल्य- ८० रु/-
प्रकाशक- पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद
संपर्क-९४ २२ ५२ ८२ ९०